ग्रामीण भागाच्या जीवनात सुख मिळवण्याची आणि हितगुज साधण्याची जागा कोणती असेन तर "घराचा ओटा आणि गावाचा पार". दिवसाचा क्षीणभाग हलका करण्यासाठी थकलेले लोक घराच्या ओट्यावर बसून अगदी घरातल्या गोष्टीपासून ते देशाच्या राजकारणापर्यंतचे सर्व विषय आवडीने चघळतात. या लोकांच्या दीर्घायुष्याचा राज काय असेल तर ओट्यावर बसून मनमोकळ्या गप्पा मारणे, सुखदुःखाचे क्षण वाटून घेणे. मनात साचत जाणारे विचार गंगेप्रमाणे प्रवाहित होतात, रोजचा नवा दिवस मोठया ताकतीने लढण्याची ताकत मिळते.
गावाच्या पारावर काही काम नसणारे आणि वयस्कर मंडळी नेहमी बसलेले असतात.डेरेदार झाडाखाली शीतल छायेत रंगणाऱ्या खुसखुशीत गप्पा म्हणजे जीवनात रंग भरणारी रंगपंचमीच. इथं तुम्हाला गप्पासाठी काही लागत नाही, प्रत्येकाच्या जीवनाचे रंजक अनुभव ऐकताना जीवाला मोठी विश्रांती मिळते.
कोणताही मुद्दा उपस्थित झाला की त्याचे वेगवेगळे कंगोरे प्रत्येकजण मांडत जातो आणि चर्चा खुलत जाते. मोबाईलच्या जगापेक्षा अनुभवांनी समृद्ध करणार मनोरंजन "याची देही याची डोळा" इथं अनुभवता येते. चंगळवादी जीवनाच्या धकाधकीत हे मनोरंजन माग पडत चाललंय हे मात्र नक्की.कोणाला कोणाचं सोयरसुतक राहील नाही. आज पण तो ओटा आणि तो पार मनात तसच घर करून आहे,फक्त आज तिथं बसता येत नाही आणि मनसोक्त गप्पा मारता येत नाही हे शल्य मनात आहे....
0 Comments