"गेले ते दिवस,राहिल्या फक्त आठवणी" ह्या ओळी कुठल्या मोटार सायकलच्या किंवा ट्रकच्या मागे वाचल्या की मनात उगीच कालवाकालव होते. जगलेल्या क्षणांचे नकळत आठवणीत रूपांतर होत जाते. ते दिवस जगतांना ते नेहमीच चांगले,आनंददायी असतात असे काही नाही; ते कधी आनंददायी असतात तर कधी त्रासदायकही. मात्र त्यांचे आठवणीत रूपांतर होताना ना जाणे कुठून त्यात कोमलपणा,हळुवारपणा येतो. एखादे मऊ पीस गालावरून फिरवावे आणि त्याच्या स्पर्शाने आपण पुलकित होऊन जावे तशीच काही अनुभूती आठवणी देतात.
जीवन म्हणजे जणू आठवणींचे गाठोडेच. अनुभवांचे पुंजके जमा करत आपण जगत असतो. त्यात विविध अनुभव येतात. कधी हर्षाचे तरंग उठतात तर कधी दुःखावेगाने जीव त्रासून जातो. नजर लागावी इतका आनंद तर जगणे मुश्किल व्हावे इतके दुःख, या सुखदुःखाच्या झोपाळ्यावर जणू मानवी आयुष्य झुलत असते.
"रम्य ते बालपण" म्हणत आपण बालपणातल्या आठवणीत गुंग होतो. बालपण किती अल्लड, किती खोडकर, त्याचबरोबर किती निष्पाप किती निर्विवार. पाण्यात होडी सोडण्याइतकी श्रीमंती बालपणानंतर कधी आपल्या जीवनात आलेली नसते. भांडणं, धिंगामस्ती, अभ्यासाचा कंटाळा, शाळा आणि शिक्षकांचा धाक आणि ओढही, नदीकिनारी खेळलेल्या सुरपारोंब्या, पाराशेजारची कबड्डी, आणि खोखो, चोरपोलिस,आबाधोबी,लपाछपी खेळतांना आलेली आपसूक प्रौढतेची जाणीव... आणि भूक लागल्यावर आठवणारे घर. सगळं कसं आठवणींच्या कुपीत गच्च भरून ठेवलेलं
0 Comments