दुष्काळी दिवाळी

यंदा सुरुवातीपासूनच संपूर्ण देवळा तालुक्यातील  शेतकऱ्यांना दुष्काळाने जेरीस घातले. यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. जे पीक हाती लागले, त्याला बाजारात भाव मिळत नाही. दिवाळी तोंडावर आहे आणि शेतकर्‍यांच्या हाती पैसा नाही. त्यामुळे त्यांच्या दिवाळीवर संक्रांत आल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर पैसा नसल्याने अंगणात तेलाच्या पणत्या जळणार की नाही, हासुद्धा प्रश्नच आहे.
दिवाळी मोठा सण आहे. या वेळी सर्वच जण खरेदीत गुंतलेले दिसतात. मात्र, शेतकर्‍यांना दिवाळी साजरी करण्यासाठी हाती पैसा नाही. परिणामत: ग्रामीण भागातून येणार्‍यांची बाजारात गर्दी दिसत नाही. आधी दमदार पाउस मग दुष्काळी परिस्थिती यांमुळे संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजला. पीक बहरण्यावर आले , तेव्हा.पावसाने पाठ फिरवली त्यामुळे होत्या नव्हत्याचा नायनाट झाला. भुईमूग,तूर हातचे गेले. टोमॅटो, डाळिंब आणि कांद्याला जबर फटका बसला. जे बाजरी मका शेतकर्‍यांच्या हाती आले त्याला बाजारपेठेत भाव मिळत नाही. शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे दिवाळीत त्यांच्या घरात दिवे लागणार की नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
      कृषी आणि महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले. मात्र ते शेतकर्‍यांच्या तोंडावर पाने पुसण्यासारखेच झाले. देवळातालुक्याभरात सरासरी ५३ टक्के नजर आणेवारी दाखवल्या गेली. अशावेळी आर्थिक मदत मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. नेत्यांची आश्वासने अन् मंत्र्यांचे दौरे या शिवाय शेतकर्‍यांना काहीच बघायला मिळाले नाही.
आता शेतकरी दिवाळी साजरी करण्यासाठी पुन्हा सावकाराच्या दरवाजात पोहोचले आहेत. हातातील पीक गहाण ठेवून पैसे उसणे घेतल्या जात आहेत. शासनाची आर्थिक मदत मिळाल्यानंतर घेतलेली उसनवारी परत करण्याच्या आशेने शेतकर्‍यांनी हे पाऊल उचलल्याचे दिसते. जे सावकाराकडे जाणार नाही त्यांची दिवाळी अंधारात होईल. शेतकर्‍यांची ही अवस्था झालेली असतानाच शेतमजुरांच्या हातातही छदाम नाही. बी-बियाण्यांसाठी काढलेले कर्ज, मजुरी देणे बाकी, मक्याला योग्य भाव नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
दिवाळीच्या तोंडावर मका बाजरी  विकायला काढले. चार पैसे हाती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र भाव योग्य मिळत नसल्याने आम्ही निराश आहोत. शासनानेही कुठलीही मदत दिली नाही. त्यांचे नेहमीच असे असते. जेव्हा पैशांची गरज असते, तेव्हा मदत देत नाही.’’

शेतात जे पेरले होते, त्यातून कसे बसे बाजरी मका  हाती लागले. मात्र, तेही पुरेसे नाही. बाजारात माल टाकला आहे, पण खरेदीसाठी व्यापार्‍यांची रेलचेल दिसत नाही. जे व्यापारी खरेदी करीत आहेत त्यांच्याकडून योग्य भाव मिळत नाही. ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांची दिवाळी आहे, आमची कसली दिवाळी राहणार.’’

:- तुषार आहेर™